
टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर संवाद होताना दिसत आहे. मागच्या काही वर्षात या दोघांमध्ये संबंध ताणल्याचं दिसून आलं होतं. वर्ल्डकप स्पर्धेच्या श्रेयवादावरून गौतम गंभीरने आपलं रोखठोक मत अनेकदा व्यक्त केलं होतं. हे एका व्यक्तीचं नाही तर संघाचं श्रेय असल्याचं त्याचं मत स्पष्ट मत होतं. आता बरंच पाणी पुलाखालून गेलं आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा संवाद होताना दिसत आहे. भारताने जेतेपद जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियाचं कौतुक केलं. इतकंच काय तर गौतम गंभीरचा कोच साहेब असा उल्लेख करताना चेहऱ्यावर हसू चांगलं वाटतं असा शेरा मारला. यावर गौतम गंभीरने सोशल मीडियावरून उत्तर दिलं होतं. गौतम गंभीरने लिहिलं होतं की, माझ्या हास्यामागे कारणच तसं होतं, तुला स्टेडियममध्ये जे पाहिलं. आता गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. इतकंच काय तर धोनीबाबत एक इच्छाही व्यक्त केली आहे.
गौतम गंभीरने धोनीचा उल्लेख करत मिश्किलपणे सांगितलं की, ‘वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी येण्याचा त्याचा निर्णय चांगला होता. मला हसायला सांगणं की ही पण चांगली बाब आहे. माझी इच्छा तर अशी आहे की, त्याने एक दिवस माझी जागा घ्यावी. तेव्हा मी त्याच्याबाबत असंच लिहीन आणि आशा आहे की तो डगआऊटमध्ये हसेल.’ गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून दुसऱ्यांदा आयसीसी चषक जिंकला आहे. पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेवर नाव कोरलं. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धाही जिंकली. आता पुढचं लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027, वनडे वर्ल्डकप 2027 आणि ऑलिम्पिक 2028 असणार आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप 2011 जिंकला होता. भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तेव्हा गंभीरने 75 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 2011 च्या वनडे वर्ल्डकप अंतिम सामन्यातही गौतम गंभीरची बॅट तळपली होती. या सामन्यात त्याने 97 धावा केल्या होत्या. तसेच महेंद्रसिंह धोनीसोबत महत्त्वाची भागीदारी करून जेतेपद मिळवून दिलं होतं. या सामन्यात धोनीने 91 धावा केल्या होत्या. तसेच विजयी षटकार मारत भारताचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं होतं.