WTC 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार?
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली आहे. आता वनडे वर्ल्डकप 2027 आणि ऑलिम्पिक 2028 स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. असं असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार का? चला जाणून घेऊयात.

भारताने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. मात्र रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी हवी तशी झालेली नाही. गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देशात झालेल्या दोन कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारतीय संघाला दोन्ही मालिकांमध्ये व्हाईट वॉश मिळाला हे सर्वात दुर्दैवी म्हणावं लागलं. न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्याने भारताचं 2025 अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका 2-0 ने गमल्याने गणित बिघडलं आहे. भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरी गाठणं अशक्य नाही, पण कठीण असणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. पहिल्या दोन स्थानावर येण्यासाठी उर्वरित 9 सामने खूपच महत्त्वाचे असणार आहेत.
टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी 4 सामने जिंकले, 4 सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. यासह 48.15 या विजयी टक्केवारीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.सहाव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला अजून 9 सामने खेळायचे आहेत. या 9 सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते यावर अंतिम दोन स्थानावर जागा मिळणार की नाही? ते ठरणार आहे. अंतिम सामन्यासाठी पात्र होण्याकरिता अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे.
टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी 9 सामन्यांपैकी किमान 7 सामने जिंकावेच लागतील. तरच विजयी टक्केवारी ही 62.96 टक्के होईल. त्यामुळे इतर संघांना मागे टाकून पहिल्या दोन स्थानी जागा मिळेल. टीम इंडियाने उर्वरित 9 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले, तर थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. म्हणजेच भारताने 9 पैकी 7 सामने जिंकले, तरी इतर संघांच्या निकालांची वाट पाहावी लागेल. भारताचे पुढील प्रतिस्पर्धी श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आहेत.
भारतीय संघ नऊ पैकी 5 सामने हे भारतात खेळणार आहे. हे पाचही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळेल. भारतीय संघापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे श्रीलंका आणि न्यूझीलंडचा त्यांच्याच भूमीवर सामना करण्याचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात कसोटी मालिका असली तरी 5-0 ने मात देणं कठीण आहे.
