IND vs AFG: भारताची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी मिळाल्या फुकटच्या पाच धावा, 22 वर्षे जुना विक्रम मोडीत
IND vs AFG 3rd ODI: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारताचा डाव सुरू होण्यापूर्वीच 5 धावा मिळाल्या. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची एक चूक संघाला महागात पडली. नेमकं काय घडलं? ते जाणून घेऊयात

India was Awarded Five Penalty Runs: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना चेन्नईच्या चेपॉकमध्ये झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या. तसेच विजयासाठी 219 धावांचं टार्गेट दिलं. भारतीय या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्यापूर्वी भारताच्या खात्यात 5 धावा जमा झाल्या होत्या. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. असं चुकून वगैरे झालं असावं असा समज झाला. पण ते तसं नाही. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची चूक अफगाणिस्तान संघाला भोवली. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी खेळपट्टीवर धावल्याने 5 धावांचा फटका बसला. त्यामुळे भारतीय संघाला 214 धावा कराव्या लागल्या.
अफगाणिस्तानला 5 धावांचा फटका असा बसला
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने जबरदस्त फलंदाजी करत पहिलं वनडे शतकं ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे अफगाणिस्तानला 200 पार धावा करण्यास मदत झाली. पण या डावाच्या 40व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हशमतुल्लाह शाहिदीने चूक केली. खेळपट्टीच्या प्रतिबंधित भागात धावला. आयसीसी नियमानुसार असं करणं नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे पंचांना अफगाणिस्तान संघावर कारवाईचा बडगा उचलावा लागला. एमसीसी नियमानुसार, फलंदाजांना खेळपट्टीच्या प्रतिबंधित भागात धाव घेण्याची परवानगी नाही. पहिल्यांचा समज दिली जाते, पण दुसऱ्यांदा तसंच केलं 5 धावांची पेनल्टी दिली जाते. शाहिदीच्या या चुकीमुळे भारताला एकही चेंडू न खेळता 5 धावा मिळाल्या. त्यामुळे रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरण्यापूर्वी 5 धावा खात्यात आल्या होत्या.
भारताने पहिल्याच षटकात केली कमाल
भारतीय संघासाठी या सामन्यातील पहिलं षटक संस्मरणीय ठरलं. या षटकात अझमतुल्लाह ओमरझाई अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना धडपडत होता. त्यामुळे हे षटक संपण्यासाठी 10 चेंडू टाकावे लागले. या षटकाचा भारताने पुरेपूर फायदा उचलला आणि 23 धावा काढल्या. यात 5 धावा पेनल्टीच्या होत्या. भारतीय संघाने वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या षटकात 23 धावा ठोकल्या. यापूर्वी 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध 22 धावा केल्या होत्या.