
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध धमाका केला आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये ओपनर संजू सॅमसन आणि इतर फलंदाजांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 254 धावांचं महाकाय असं आव्हान दिलं आहे. सूर्यासेनेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने या धावांसह असंख्य विक्रम मोडीत काढले आहेत. टीम इंडियाने नक्की काय काय केलं? तसेच कोणत्या फलंदाजाने किती धावांचं योगदान दिलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टॉस गमावल्यानंतर टीम इंडियाची संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली. अभिषेक या सामन्यातून कमबॅक करेल, असं वाटलं होतं. मात्र अभिषेकने पुन्हा निराशा केली. भारताच्या 20 धावा असताना अभिषेक 9 रन्सवर आऊट झाला.
अभिषेक आऊट झाल्यानंतर संजूने इशान किशन याच्या मदतीने धमाका केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी वादळी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी फक्त 45 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. इशानला मोठ्या खेळीची संधी होती. मात्र इशानने फटकेबाजी करुन आपली भूमिका चोखपणे पार पाडली. इशानने 18 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.
इशान आऊट झाल्यानंतर संजूने शिवम दुबेसह 22 बॉलमध्ये 43 रन्सची पार्टनरशीप केली. संजूला शतकाची चांगली संधी होती. मात्र संजू आऊट झाला. संजूचं शतक अवघ्या 11 धावांनी हुकलं. संजूने 89 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत जोरदार फटकेबाजी केली.
संजू आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या चौघांनी वादळी खेळी केली. सूर्याने 11, शिवमने 43, तिलकने 21 तर हार्दिकने 27 धावांचं योगदान दिलं. तर अक्षर पटेल 2 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियाने यासह 253 धावांपर्यंत मजल मारली. तर इंग्लंडसाठी आदिल रशीद आणि विल जॅक्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट मिळवली.
दरम्यान टीम इंडियाने या 253 धावांसह काही ऐतिहासिक असे विक्रम केले. इंडिया 2 वेळा 250 पेक्षा अधिक धावा करणारी दुसरी टीम ठरली. तसेच टीम इंडियाने एका डावात सर्वाधिक 19 षटकार लगावले. तसेच भारताने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत विंडीजच्या सर्वोच्च 205 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. विंडीजने 2012 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 विकेट्स गमावून 205 धावा केल्या होत्या.