
टीम इंडिया नववर्षातील पहिलीच आणि एकदिवसीय मालिका जिंकण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने भारतावर इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 41 धावांनी मात केली. भारताने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर झुंज दिली. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन विराटचा चांगली साथ दिली. मात्र विराट कोहली, नितीश आणि हर्षित या तिघांते प्रयत्न भारताला विजयी करण्यात अपुरे ठरले. न्यूझीलंडने 338 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला 46 ओव्हरमध्ये 296 धावांवर ऑलआऊट केलं.
भारताने अशाप्रकारे सलग आणि एकूण दुसरा सामना गमावला. तर न्यूझीलंडने 2026 वर्षातील आणि भारतात टीम इंडिया विरुद्धची पहिलवहिली एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी करत इतिहास घडवला. कर्णधार म्हणून शुबमन गिल याची मायदेशातील ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती. शुबमन या मालिकेत कर्णधार म्हणून अपयशी ठरला. शुबमनने या पराभवानंतर काय म्हटलं? शुबमनने पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? हे जाणून घेऊयात.
शुबमनने पराभवानंतर प्रेझेंटेटरसह संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. शुबमनने सामन्यात ज्यात कमी पडलो त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. तसेच शुबमनने विराट कोहली याच्या खेळीचा उल्लेख केला. सोबतच शुबमनने हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. भारतासाठी तिसऱ्या सामन्यात विराट कोहली याने सर्वाधिक 124 धावा केल्या. नितीशने 53 तर हर्षितने 52 धावा केल्या. या तिघांनी केलेल्या खेळीमुळे न्यूझीलंडला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
शुबमनने भारताच्या मालिका पराभवानंतर निराशा व्यक्त केली. “पहिल्या सामन्यातील विजयानंतर मालिका 1-1 ने बरोबरीत असताना आम्ही जे खेळलो ते निराशाजनक होतं. काही गोष्टीत आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे”, असं शुबमनने म्हटलं.
“विराट भाई ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ती भारतासाठी जमेची बाजू असल्याचं शुबमनने म्हटलं. तसेच विराटने हर्षितच्या अर्धशतकाबाबतही भाष्य केलं. “आठव्या स्थानी बॅटिंग करणं सोपं नसंत. मात्र त्यानंतरही त्याने (हर्षित) ती जबाबदारी स्वीकारली”, असं शुबमन म्हणाला.
शुबमनने भारतीय गोलंदांच्या कामगिरीचं कौतुक केलं. वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली, असं शुबमन म्हणाला.
शुबमनने अर्धशतक करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीबाबत प्रतिक्रिया दिली. “वर्ल्ड कप स्पर्धा कुठे आहे हे पाहता आम्हाला नितीशला संधी द्यायची आहे. नितीशकडून खूप ओव्हर बॉलिंग करुन घ्यायची आहे”, असंही गिलने नमूद केलं.