
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 256 धावा केल्या. तसेच विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 184 धावा केल्या. भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला. यामुळे झिम्बाब्वेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. झिम्बाब्वेचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. झिम्बाब्वेने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली होती. या खेळीच्या जोरावर त्यांनी सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच जागा मिळवली होती. पण सुपर 8 फेरीत पदरी निराशा पडली. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने दारूण पराभव केला. त्यानंतर भारताने पराभवाची धूळ चारली. आता या स्पर्धेचा शेवट झिम्बाब्वे कसा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुसरीकडे, भारताच्या विजयाने दक्षिण अफ्रिकेला रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. भारताच्या विजयामुळे दक्षिण अफ्रिकेचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं झालं आहे. दक्षिण अफ्रिकेने भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांना पराभूत करत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे. पण भारत आणि वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची लढाई असेल.
तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या संघासाठी चुरस असणार आहे. हा सामना 1 मार्चला होणार आहे. या सामन्यात विजय हा एकमेव पर्या असणार आहे. त्यामुळे नेट रनरेट वगैरे काहीच भानगड नसेल. त्यामुळे विजयाचं गणित सोडवण्याचं आव्हान असणार आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकताच उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार नाही हे पक्कं आहे. कारण भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्यामुळे इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी सामना होईल. तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.