पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्याने पाकिस्तान क्रिकेट होईल उद्ध्वस्त, माजी कर्णधाराला धास्ती
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची नाटकं सुरू आहेत. भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे. पण हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट येऊ शकतो. पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने भीती व्यक्त केली आहे.

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने स्पर्धेला मुकला आहे. तसेच त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे करत पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची टी20 लीग स्पर्धेवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पीसीबीचा माजी प्रमुख रमीझ राजा याने भीती व्यक्त केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या एका इशाऱ्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट उद्ध्वस्त होण्याची भीती त्याने व्यक्त केली आहे.
रमीझ राजा व्हायरल व्हिडीओत स्पष्ट सांगत आहेत की, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून 50 टक्के निधी मिळतो. आयसीसी स्पर्धांचं आयोजन करते आणि त्यांच्या बोर्ड सदस्यांना वाटून देते. आयसीसीला 90 टक्के निधी हा एकट्या भारतातून येतो. त्यामुळे भारताचा दबदबा आहे आणि पाकिस्तानी क्रिकेटही त्यामुळेच चालत आहे. जर उद्या भारताच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला की आम्ही पाकिस्तानला निधी देणार नाही तर पीसीबी उद्ध्वस्त होऊ शकते. आपल्याला स्वत:च्या पायावर उभं राहावं लागेल. बीसीसीआयवरील अवलंबित्व दरवर्षी 10 टक्क्यांनी कमी करणं गरजेचं आहे.’
Ramiz Raza had said Pakistan Cricket team survives on ICC grants of which 90% is generated by BCCI. The Indian PM can finish Pakistan cricket easily.
Then fools believe they can form parallel council to the ICC 😂. Fact is Pakistan cricket is at the mercy of Jay Shah. #INDvsPAK pic.twitter.com/m1rYw5wkOq
— Ganesh (@me_ganesh14) February 2, 2026
पाकिस्तान देशात आर्थिक डबघाईला गेला आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची दैना झाली आहे. त्यामुळे भारताविरुद्ध आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न खेळणं अडचणीचं ठरेल. यामुळे मोठा आर्थिक फटका पाकिस्तानला सहन करावा लागणार आहे. इतकंच पाकिस्तानचं सदस्यत्वही निलंबित होऊ शकतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्णय घेतला खरा, पण त्यांच्या अंगलट येऊ शकतं. कारण भविष्यात याच मुद्द्यावर भारतीय संघ पाकिस्तानला अडचणीत आणू शकतो. 2028 आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान आग्रही आहे. अशा स्थितीत आयसीसी नाक दाबून तोंड उघडू शकते. त्यामुळे पाकिस्तानला यू-टर्न घेण्याशिवाय पर्याय नाही.
