IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सच्या मानहानीकारक पराभवानंतर अक्षर पटेल वैतागला, सामना संपल्यानंतर म्हणाला…
आयपीएल स्पर्धेच्या 39व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर बरेच नकोसे विक्रम रचले गेले. या सामन्यात दिल्लीचा दारूण पराभव झाला. यानंतर कर्णधार अक्षर पटेलने संताप व्यक्त केला.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 39व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला सहज पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर नाणेफेकीनंतर फलंदाजांनीही साथ दिली नाही. पावर प्लेमध्ये निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला. अवघ्या 8 धावांवर सहा गडी तंबूत परतले होते. तर सहा षटकात 13 धावा करता आल्या. त्यामुळे संघाच्या 20 धावा होतात की नाही याबाबत शंका होती. मात्र अभिषेक पोरेलने 30 धावांची खेळी केली आणि दिल्ली कॅपिटल्स संघ 75 धावांपर्यंत पोहोचला. खरं तर आयपीएल स्पर्धेत इतक्या कमी धावा म्हणजे पराभव निश्चित असतो आणि झालंही तसंच.. आरसीबीने या धावांचा पाठलाग करताना पावरप्लेमध्ये निम्म्याहून अधिक लढाई जिंकला. 6.3 षटकात 1 गडी गमवून दिलेले आव्हान गाठलं. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित झाला. या मानहानीकारक पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल संतापलेला दिसला.
आयपीएल स्पर्धेत आरसीबीने 9 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सला 6.3 षटकात नमवलं. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने पराभवानंतर सांगितलं की, ‘काय झाले हे मलाही माहीत नाही. म्हणूनच म्हणतात की क्रिकेटमध्ये नेहमी सतर्क राहावे लागते. आपल्याला या सामन्यातून पुढे जायचे आहे. आजच्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणू शकता की त्याचा परिणाम झाला, पण तुम्ही मागे वळून पाहू शकता, जर झेल घेतले असते किंवा जीटीविरुद्ध एक धाव घेतली असती, तर सामन्याची गती आमच्या बाजूने असती. खेळ असा आहे की त्यात ‘जर-तर’ला जागा नसते. तुम्हाला सकारात्मक राहावे लागेल, तुमचा दिवस खराब गेला असेल आणि गेल्या 5-6 सामन्यांमधून सकारात्मक गोष्टी घ्याव्या लागतील. मला आश्चर्य वाटले नाही, ते जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत, ते प्रत्येक मैदानावर चेंडू स्विंग करतात, पण जर आमच्या सलामीवीरांनी किंवा आघाडीच्या फळीने त्यांना खेळून काढले असते तर निकाल वेगळा लागला असता.’
दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव झाल्यानंतर गुणतालिकेत सातव्या स्थानावर कायम राहिले आहेत. तसेच नेट रनरेट कमालीचा घसरला आहे. त्यामुळे प्लेऑफची वाट आणखी बिकट होणार आहे. कारण आता दिल्ली कॅपिटल्सला उर्वरित सहा पैकी 5 सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे.
