Venkatesh Iyer: वेंकटेश अय्यर ठरला पंजाब किंग्सच्या पराभवाचा सूत्रधार, सामन्यानंतर म्हणाला की…
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात वेंकटेश अय्यरची बॅट चांगलीच तळपली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे आरसीबीने 222 धावांचा पल्ला गाठला. त्यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर त्याने आपलं म्हणणं मांडलं.

आयपीएल 2026 स्पर्धेतही गतविजेत्या आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. पंजाब किंग्सला 23 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा राहिला तो डावखुरा फलंदाज वेंकटेश अय्यरचा.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे आरसीबीचा डाव मधल्या फळीत सावरला आणि 222 धावांपर्यंत मजल मारता आली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी ठेवलेली धावगती वेंकटेश अय्यरने पुढे नेली. त्याने 40 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 73 धावा केल्या. त्याने 182.50 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. खरं तर या सामन्यात कर्णधार रजत पाटिदार नसल्याने वेंकटेश अय्यरला संधी देण्यात आली. त्याने चौथ्या स्थानी उतरून आपली भूमिका चोख बजावली. वेंकटेश अय्यरची सुरुवात संथ होती. त्याने 11 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला.
वेंकटेश अय्यर सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला की, ‘तांत्रिकदृष्ट्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेला हा माझा दुसरा सामना आहे आणि आज पहिल्यांदाच मला व्यवस्थित फलंदाजी करायला मिळाली. त्यामुळे सामनावीर पुरस्कार मिळण्यापेक्षा ही गोष्ट जास्त आनंददायी आहे. आणि सोबत दोन गुणही मिळाले, त्यामुळे खूप आनंद झाला आहे. मी केकेआरमध्ये बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे हो, एक भावनिक नाते असेल, पण मला इथे खरोखरच घरासारखे वाटले आहे.’
वेंकटेश अय्यर पुढे म्हणाला की, ‘मी निराश नव्हतो किंवा मला खेळण्याची इच्छा नव्हती, असे मी म्हटले तर ते खोटे ठरेल. मला खरंच मैदानात उतरून खेळायची खूप इच्छा होती, कारण आमच्यासारख्या खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची ही एक संधी असते. आम्हाला खेळायचं असतं, आम्हाला चांगली कामगिरी करायची असते. पण मला हे समजतं, मी इथे इतका काळ राहिलो आहे की मला हे कळतं की हा एक चॅम्पियन संघ आहे आणि संघात बदल करणं नेहमीच योग्य नसतं. पण मला खेळवण्यासाठी मी नेहमीच कोचिंग स्टाफवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि मी चांगली कामगिरी करून दाखवेन. मला संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.’
वेंकटेश अय्यरने सुरूवातीच्या संथ खेळीबाबत विश्लेषण करताना सांगितलं की, ‘मला वाटतं, हो, सुरुवातीला खेळ थोडा अडखळत होता, पण मी नशीबवान होतो की मला विराट कोहलीसोबत फलंदाजी करायला मिळाली. साहजिकच, तो तुमच्यापर्यंत जो मानसिकतेतील बदल पोहोचवू शकतो, तो महत्त्वाचा आहे. मला वाटतं, खेळातील सर्व दिग्गजांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे संवाद, हीच गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला संवाद साधू शकलात, कारण मैदानात दोघे जण संघासाठी एकत्र धावा करत असतात, त्यामुळे तीच गुरुकिल्ली होती.मी इथे खेळत आलो आहे, पण या हंगामात मी खूप दिवसांनी खेळलो. खरं तर, लय पकडण्यासाठी मला सुरुवातीचे ते काही चेंडू आवश्यक होते. एकदा का मला खेळपट्टी समजली आणि गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा ते माझ्यासाठी चांगलेच झाले, असे मला वाटते.’
