
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. सलग दोन वर्षे आणि तिसऱ्यांदा जेतेपदाचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. या स्पर्धेत संजू सॅमसनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. हे तिन्ही सामने करो या मरोच्या स्थितीत होते. त्यामुळे त्याच्या खेळीचं कौतुक होत आहे. सुरूवातीच्या सामन्यात संजू सॅमसन बेंचवर बसला होता. त्याची प्लेइंग 11 मध्ये जागा होत नव्हती. पण सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आणि संजू सॅमसनला एन्ट्री मिळाली. त्याने या स्पर्धेतील पाच सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द सिरिजच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. असं असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने संजू सॅमसनकडे टी20 संघाचं कर्णधारपद सोपवण्याची मागणी केली आहे.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘जर सूर्यकुमार यादव कर्णधारपद सोडणार असेल तर संघाचं नेतृत्व संजू सॅमसनकडे द्यायला हवं. कारण संजू सॅमसनकडे चांगले नेतृत्व गुण आहेत.’ इतकंच काय तर कर्णधार असा असावा की त्याला संघातील प्रत्येक खेळाडूचं मूल्य ओळखता यायला हवं. तसेच फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देता आलं पाहीजे. अपयश हा खेळाचा भाग आहे आणि कर्णधाराने समजून घेतल्यास संघाला फायदा होईल, असंही कैफ पुढे म्हणाला.
सूर्यकुमार यादव सध्या 35 वर्षांचा आहे. 2028 च्या टी20 विश्वचषकापर्यंत 37 वर्षांचा होईल. वयाच्या 37 व्या वर्षी संघाचे नेतृत्व करेल अशी शक्यता कमी आहे. दुसरीकडे, त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने जेतेपद मिळवलं असलं तरी त्याची कामगिरी हवी तशी नाही. अंतिम सामन्यातही शून्यावर बाद झाला होता. त्याने या वर्ल्डकप स्पर्धेत 30.25 च्या सरासरीने फक्त 242 धावा केल्यात. दरम्यान, संजू सॅमसन आता 31 वर्षांचा आहे. तसेच त्याच्याकडे टी20 क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व सांभाळलं आहे. त्यामुळे त्याचा कर्णधार म्हणून विचार चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचा फॉर्म चांगला असेल आणि त्याने फिटनेस कायम ठेवले तर तो निश्चितच नेतृत्व करू शकतो.