RR vs SRH: 25 एप्रिलला काही तरी मोठं घडणार! वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांच्या भाकीताने उत्सुकता शिगेला
आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता उत्तरार्धात आणखी वाढत जाणार आहे. कारण आता टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस वाढणार आहे. असं असताना 25 एप्रिलच्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. कारण या सामन्यात द्वंद्व पाहायला मिळणार आहे. कसं काय ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 36व्या सामन्यात 36चा आकडा पाहायला मिळणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहे. पहिल्या सामन्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी राजस्थान रॉयल्सकडे आहे. पण या व्यतिरिक्त एक द्वंद्व या सामन्यात दिसणार आहे. कारण या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी आणि प्रफुल हिंगे आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीला गोल्डन डकवर बाद केलं होतं. तसेच सामना संपल्यानंतर त्याने समालोचकांशी बोलताना सांगितलं की, संघ सहकाऱ्यांना आधीच सांगितलं होतं की वैभवला पहिल्या चेंडूवर बाद करेन. पण विधानावरून वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांचा संताप झाला होता. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा 25 एप्रिलला होणाऱ्या सामन्याबाबत उत्सुक आहेत.
आयपीएल स्पर्धा सुरू असताना वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांना हिंगेच्या विधानाबाबत आश्चर्य वाटलं होतं. तसेच त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना आपला आक्षेप नोंदवला होता. त्यांनी सांगितलं होतं की, जर कोणता खेळाडू क्रिकेटमध्ये काही सांगून असं करत असेल तर ती मोठी बाब आहे. त्यामुळे आता 25 एप्रिलला काय होते ते पाहूयात. मनीष ओझा यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं की, 25 एप्रिलला सर्व कामधंदे सोडून राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना पाहणार आहे. आशा आहे की वैभव सूर्यवंशी प्रफुल हिंगेचा समाचार घेईल. क्रिकेट काहीच सांगता येत नाही. 25 एप्रिलला जे काही होईल ते मोठं असेल, असं त्यांनी पुढे सांगितलं.
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ मागच्या सामन्यात हैदराबादमध्ये भिडले होते. आता राजस्थान रॉयल्सचं होमग्राउंड असलेल्या जयपूरमध्ये हा सामना होणार आहे. वैभव सूर्यवंशीला या खेळपट्टीचा पूरेपूर अंदाज आहे. त्यामुळे प्रफुल हिंगेला गोलंदाजी करताना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पहिल्या चेंडूवर आणि पहिल्या षटकात वैभव भारी पडला तर पुढे कठीण आहे. कारण भल्याभल्या गोलंदाजांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे प्रफुल हिंगेसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे. त्यात पास होतो की नाही हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.