वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेतून रोहित शर्माला डावलण्याचा निर्णय योग्यच? दक्षिण अफ्रिकेतील मैदानं आहेत कारणीभूत
भारताची स्टार फलंदाज रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणं कठीण आहे. त्याला या संघात नसल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसात उठल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण दक्षिण अफ्रिकेतील त्याची आकडेवारी पाहता घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं तज्ज्ञ म्हणत आहेत.

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत असून 2027 वर्ल्डकप स्पर्धेवर त्याचं लक्ष आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धच्या वनडे मलिकेत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होणार या बातम्या समोर आल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेच्या शेवटच्या सामन्यानंतर निवृत्ती घेणार, अशा अफवा सोशल मीडियावर उडल्या आहेत. पण बीसीसीआयने या सर्व अफवा असल्याचं सांगत खंडन केलं आहे. असं असलं तरी रोहित शर्माचं वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत निवड होईल की नाही? असा प्रश्न आहे. रोहित शर्माला या स्पर्धेतून डावललं जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते, असा विचार होत असेल तर तो योग्यच आहे. त्याला कारणंही तसंच आहे. चला जाणून घेऊयात.
वनडे वर्ल्डकप संघातून डावलणं योग्यच?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या जेतेपदानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारलं गेलं. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. रोहित शर्माच्या पुढचा विचार निवड समिती करत असल्याचे यातून संकेत मिळाले होते. असं असताना आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत त्याला संघात जागा मिळवणं कठीण आहे. त्यात त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघात स्थान मिळवणं सोपं नाही. रोहित शर्माची बॅट वर्षभरापासून शांत आहे. या वर्षात रोहित शर्मा 8 वनडे सामने खेळला आणि 30.12 च्या सुमार सरासरीने फक्त 241 धावा केल्या. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही फेल गेला. तर इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत 11 आणि दुसऱ्या वनडेत 26 धावा करून बाद झाला.
दक्षिण अफ्रिकेत रोहित शर्माची सुमार कामगिरी
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. दक्षिण अफ्रिकेत रोहित शर्माची आकडेवारी पाहिली तर कामगिरी निराशाजनक आहे. रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेत 14 वनडे सामने खेळले आहेत. त्यात 19.69च्या सरासरीने आणि 68.44 च्या संथ स्ट्राईक रेटने फक्त 256 धावा केल्या आहे. यात एक शतक ठोकलं आहे. भारताने 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेत शेवटचा दौरा केला होता. यात 6 वनडे सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 170 आल्या होत्या. यात 115 धावांची शतकी खेळीचा समावेश आहे. म्हणजेच ही खेळी सोडली तर त्याला धावा करण्यात अडचण आली आहे, हे अधोरेखित होतं. त्यामुळे त्याची कामगिरी पाहता डावललं गेलं तर हा निर्णय योग्यच ठरेल, असं क्रीडा तज्ज्ञ म्हणत आहेत.