वैभव सूर्यवंशीची कमकुवत बाजू आयपीएलच्या एका नियमामुळे झाकली, संजय मांजरेकर स्पष्ट म्हणाले की..
आयपीएल 2026 स्पर्धेत डावखुरा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने छाप सोडली आहे. त्याच्या आक्रमक शैलीची धास्ती दिग्गज गोलंदाजांनी घेतली आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्याच्या एका कमकुवत बाजूकडे लक्ष वेधलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी खूपच लक्षवेधी ठरली. या तरूण फलंदाजाने भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या आक्रमक शैलीने घाम फोडला. त्याला गोलंदाजी करताना अनेकदा विचार करावा लागत आहे. दिग्गज गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याची त्याची रणनिती आहे. या रणनितीमुळे नेमका कुठे टप्पा टाकायचा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. यॉर्कर टाकताना अंदाज चुकला तर थेट सीमेपार चेंडू पाठवण्याची ताकद त्याच्यात आहे. आखुड टप्प्याच्या चेंडूवरही जोरदार प्रहार करतो. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचं कौतुक होत आहे. असं असताना समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्याच्या कमकुवत बाजूकडे लक्ष वेधळ आहे. बीसीसीआयचा एक नियम त्याच्यासाठी वरदान ठरत आहे असा त्यांनी सांगितलं.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, हा कमकुवतपणा वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीत नाही तर क्षेत्ररक्षणात आहे. स्पोर्टस्टार मासिकाला दिलेल्या मुलाखतीत संजय मांजरेकर यांनी वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणाचे उदाहरण देत आयपीएलच्या वादग्रस्त इम्पॅक्ट प्लेयर नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. क्रीडाप्रेमींना या युवा खेळाडूची फक्त फलंदाजी पाहायची आहे की दुसरी बाजूही पाहायची आहे. यासाठी इम्पॅक्ट प्लेयर नियम काढावा लागेल. क्रिकेटपटूंसाठी चांगल्या फलंदाजीइतकेच क्षेत्ररक्षणही महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न उपस्थित करत इंजमाम उल हकचे उदाहरण दिले. प्रत्येक जण इंझमामच्या फलंदाजीचं कौतुक करतो, पण क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा दुसरा पैलूही उघड झाला.
संजय मांजरेकर यांनी पुढे सांगितलं की, “आम्ही एका खेळाडूचे तिन्ही पैलू पाहण्याची अपेक्षा करत नाही. पण जेव्हा मी स्पर्धेत छाप पाडणाऱ्या खेळाडूंबद्दल विचार करतो. तेव्हा वैभव सूर्यवंशीकडेच बघा, तो क्षेत्ररक्षण कसे करतो आणि दबावाखाली काय करतो हे पाहावेसे वाटते. जर तो एक उत्कृष्ट फलंदाज असेल पण क्षेत्ररक्षणात त्याच्यावर दबाव असेल, तर इतर संघांनी त्याचा फायदा घ्यावा असे मला वाटते. फक्त फलंदाजी करून मग विश्रांती घेणे, खेळाचा सर्वोच्च स्तर इतका सोपा असावा असे कोणालाही वाटणार नाही.”
