
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तसं पाहिलं तर टीम इंडियाचं होमग्राउंड असल्याने भारताचं पारडं जड आहे. तसेच या मैदानावर बरंच क्रिकेट खेळलेले खेळाडू भारतीय संघात आहेत. त्यामुळे भारताचं वजन अधिक आहे. मात्र असं असलं तरी इंग्लंडला कमी लेखूण चालणार नाही. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. इंग्लंडच्या एका खेळाडूपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू विल जॅक्स आहे… विल जॅक्स सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 4 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म काय आहे हे दिसून येते.
विल जॅक्सने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सात सामन्यात 191 धावा केल्या आहेत. तसेच सात विकेटही काढल्या आहे. मोक्याच्या क्षणी इंग्लंडला संकटातून काढण्यात त्याचा हातभार राहिला आहे. त्याच्या खेळीचा अंदाज घेऊन माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, ‘जर खेळपट्टी थोडी वळली तर विल जॅक्सचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी एक आव्हान असेल. विशेषतः संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यासारखे उजव्या हाताचे फलंदाज त्याच्याविरुद्ध कसे खेळतात हे सामन्याचा निकाल ठरवेल.’ इतकंच काय तर विल जॅक्सचा सामना करताना डावखुऱ्या फलंदाजांनी सावध राहावं. डावखुरे फलंदाज अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी काळजीपूर्वक फलंदाजी करावी.
विल जॅक्स हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला खोली मिळते. त्याची आक्रमक फलंदाजी इंग्लंडसाठी फायद्याची ठरते. उपांत्य फेरीचा सामना हा रोमांचक होईल असं भाकीत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. सुनील गावस्कर यांनी स्पष्ट केलं की, दोन्ही संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि अनुभवात समान आहेत आणि जो कोणी दबावावर मात करेल तो अंतिम फेरीत पोहोचेल.