T20 WC 2026 : भारत पाकिस्तान उपांत्य की अंतिम फेरीत भिडणार? जाणून घ्या आयसीसीचा नियम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आहे. शेवटच्या सामन्यातील निकालानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. पण या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली तर काय?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांनी स्थान पक्कं केलं आहे. पण अजून दोन संघांसाठी भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरस आहे. या चार पैकी दोन संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवलं तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. अन्यथा न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत जाईल. समजा भारत आणि पाकिस्तान या दोन संघांचं उपांत्य फेरीचं गणित सुटलं. तर हे दोन संघ उपांत्य कि अंतिम फेरीत भिडणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. चला जाणून घेऊयात आयसीसीचा नियम काय आहे ते
भारत पाकिस्तान सामना कसा होणार?
सुपर 8 फेरीतील गट 1 मध्ये भारत, तर गट 2 मध्ये पाकिस्तानचा संघ आहे. भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत जागा मिळवली तरी हे दोन संघ आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर राहतील. त्यामुळे उपांत्य फेरीत या दोन्ही संघाची लढत होणार नाही. कारण गट 1 मधील टॉप असलेल्या दक्षिण अफ्रिकेचा सामना गट 2 मधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानशी होईल. तर गट 2 मधील टॉप असलेल्या इंग्लंडचा सामना गट 1 मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताशी होईल. पण पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा सामना 64 धावांनी किंवा दिलेलं आव्हान 13.1 षटकात पूर्ण आवश्यक आहे.
भारत पाकिस्तान अंतिम फेरीत भिडणार!
जर तरच सर्व गणितं सुटली आणि भारत पाकिस्तानने उपांत्य फेरीत विजय मिळवला. तर या दोन संघाची लढत अंतिम फेरीत होईल. 2007 टी20 वर्ल्डकपनंतर दुसऱ्यांदा हे दोन संघ अंतिम फेरीत भिडू शकतात. पण हे गणित सुटलं तरच.. तसेच हा सामना कोलंबोत होईल. कारण पाकिस्तान भारतात सामना खेळणार नाही. दरम्यान, भारताने पाकिस्तानला साखळी फेरीत 61 धावांनी पराभू केलं होतं.
