टीम इंडियाचं नेमकं चुकतंय काय? कर्णधार गिलने बरोबर हेरलं, WTC फायनल फेरी गाठणं होणार सोपं
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेत मालिका जिंकली. भारताने श्रीलंकेला दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पराभूत केलं. पण या मालिकेतून कर्णधार शुबमन गिलला बरंच काही शिकायला मिळालं. नेमकं काय चुकतंय? हे त्याने बरोबर हेरलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत भारताला आणखी दोन मालिका खेळायच्या आहेत. या दोन्ही मालिका भारतासाठी करो या मरोच्या स्थितीत असणार आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 2, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे. तर आणि तरच अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या दोन स्थानावर विराजमान होण्यासाठी पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कसोटी लागणार आहे. असं असताना या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला आपली कमकुवत बाजू सुधारणं गरजेचं आहे. पण ही कमकुवत बाजू आहे तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत भारताची ताकद होती तीच आज कमकुवत बाजू ठरली आहे. ती बाजू म्हणजे भारतीय फलंदाजांना फिरकीचा सामना करताना आलेली अडचण..
कर्णधार शुबमन गिलने यावर दिला रामबाण उपाय
कर्णधार शुबमन गिलने संघातील कमकुवत बाजूचा बरोबर अभ्यास केला आहे. तसेच त्यावर कसा तोडगा काढता येईल याबाबत सल्ला दिला आहे. यासाठी बीसीसीआयकडे मागणीही ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका मायदेशात होणार आहे. मायदेशात कसोटी मालिका असताना टेन्शन काय? असा प्रश्न मनात आला असेल. पण मागच्या दोन मालिकांमध्ये भारताला क्लिन स्विप मिळाला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिका गमावली आहे. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताची पिछेहाट झाली होती. आता हीच भीती दूर करण्याचा शुबमन गिलचा मानस आहे.
शुबमन गिलने सल्ला दिला की ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्यात फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारताच्या काही फलंदाजांनी खेळावं. यामुळे बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तयारीला बळ मिळेल. इतकंच काय तर फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या बनवण्याचा सल्ला दिला आहे. पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात लिहिलं आहे की, ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सरसकट फिरकीला मदत करणारी खेळपट्टी तयार करता येणार नाही. पण सुरूवातीला वेगवान नंतर फिरकीला मदत होईल अशी खेळपट्टी नक्कीच तयार करू शकतो.
शुबमन गिलने दिलेला सल्ल्यावर अमलबजावणी करण्यात आणखी एक अडचण आहे. इराणी ट्रॉफीमुळे खूप कमी कसोटी प्लेयर ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळू शकतात. जर ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध त्यांना संधी दिली तर रेस्ट ऑफ इंडिया संघ कमकुवत होईल. त्यामुळे त्याचा थेट प्रभाव देशांतर्गत सामन्याच्या स्टँडर्डवर पडेल.