Asia Cup 2025 : भारताचा कोणताच खेळाडू सोबत जाणार नाही, झालं असं की….
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. असं असताना भारतीय खेळाडू दुबईला रवाना होण्यापूर्वी एक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा नियमात बदल केला असून आता भारताचे खेळाडू एकत्र जाणार नाहीत. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ 4 सप्टेंबरला दुबईला दाखल होणार आहे. कारण भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. सहा दिवस आधी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत सराव केला जाणार आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे भारताचे खेळाडू वेगवेगळे जाणार आहेत. रिपोर्टनुसार, कोणत्याही विदेश दौऱ्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईला एकत्र आणि त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी कूच करतात. पण यावेळी सर्व खेळाडू आपआपल्या जागेवरून दुबईला वेगवेगळ्या वेळी पोहोचणार आहेत. बीसीसीआयने हा निर्णय लॉजिस्टिक्स आणि खेळाडूंच्या प्रवासाची सुविधा लक्षात घेऊन घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. गतविजेता भारतीय संघ यंदाही जेतेपदाचा दावेदार आहे. तसेच वर्ल्डकप 2026 स्पर्धेची लिटमस टेस्ट म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘सर्व खेळाडू 4 सप्टेंबरला संध्याकालपर्यंत दुबईत येतील. पहिलं सराव शिबीर 5 सप्टेंबरला आयसीसीच्या अकादमीत होईल. लॉजिस्टिक सुविधा लक्षात घेत खेळाडू आपआपल्या शहरातून दुबईला येतील. काही खेळाडून मुंबईत प्रवास करतील. पण दुसऱ्या खेळाडूंना पहिल्यांदा मुंबईत आणि नंतर दुबई जाण्यासाठी सांगितलेलं नाही.’ रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर यांना स्टँड-बाय खेळाडू आहेत, त्यामुळे ते काही दुबईला जाणार नाहीत. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना युएईसोबत होणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला पाकिस्तानशी लढत होईल. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना 19 सप्टेंबरला ओमानशी होईल.
सूर्यकुमार यादव कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरतो याची उत्सुकता आहे. संघात शुबमन गिलने पुनरागमन केलं आहे. त्यात त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्याचं संघात खेळणं निश्चित आहे. अशा स्थितीत संजू सॅमसन की जितेश शर्मा हा पर्याय उरतो. शुबमन गिल आल्याने संजू सॅमसनची निवड झाली तर मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल.
