Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात मानाचा तुरा, राष्ट्रपतींच्या हस्ते मोठा सन्मान
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 14व्या वर्षीच अनेक देदीप्यमान विक्रमांना गवसणी घातली आहे. क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आहे. नुकतंच विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात 190 धावांची खेळी केली होती. असं असताना त्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 20 20 बालकांचा सन्मान करण्यात आला. काहींना त्यांच्या शौर्याबद्दल, तर काहींना क्रीडा, संगीत किंवा विज्ञानातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा असलेल्या वैभव सूर्यवंशी रोज काही ना काही अध्याय लिहित आहे. क्रिकेट विश्वात त्याच्या नावाची चर्चा रंगत आहे. अवघ्या 14व्या वर्षी वैभव सूर्यवंशी क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. इतकंच काय तर एका पाठोपाठ एक विक्रमांना गवसणी घालत आहे. त्याच्या या विक्रमी खेळीची दखल भारत सरकारने घेतली. तसेच त्याला पुरस्कार देऊन गौरव केला. वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च अशा बाल पुरस्कार असलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूने एका खास कार्यक्रमात बिहारच्या वैभव सूर्यवंशीला हा पुरस्कार प्रदान करत त्याचा गौरव केला.
वैभव सूर्यवंशीने अल्पवधीतच क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसर्या सामन्यासाठी बिहार संघ मैदानात असताना वैभव पुरस्कार घेण्यासाठी विज्ञान भवनात उपस्थित होता. बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या वैभवला क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. आयपीएलमधील सर्वात तरूण खेळाडू आणि सर्वात जलद शतक करणारा फलंदाज होता. तसेच त्यानंतर झालेल्या अनेक स्पर्धा आणि सामन्यांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतलं. पुरस्कारासाठी वैभवचं नाव पुकारताच संपूर्ण विज्ञान भवनात टाळ्यांचा कडकडाट झाला.
View this post on Instagram
वैभवला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वैभवचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंसीने इंस्टाग्रामवर वैभवचा फोटो घेतानाचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आज वैभवला आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी बाल पुरस्काराने सन्मानित केले. आपल्या राष्ट्रपतींनीही वैभवचे कौतुक केले.”
बाल पुरस्कार विजेते
- व्योमा प्रिया – शौर्य – तमिळनाडू (मरणोपरांत)
- कमलेश कुमार – शौर्य – बिहार (मरणोपरांत)
- मोहम्मद सिडान पी – शौर्य – केरळ
- अजय राज – शौर्य – उत्तर प्रदेश
- एस्थर लालदुहोमि – कला संस्कृती – मिझोरम
- सुमन सरकार – कला संस्कृती – पश्चिम बंगाल
- पूजा – पर्यावरण – उत्तर प्रदेश
- शवन सिंह – सामाजिक सेवा – पंजाब
- वंश तायल – सामाजिक सेवा – चंदीगड
- आइशी प्रिशा – विज्ञान तंत्रज्ञान – आसाम
- अर्णव महर्षि – विज्ञान तंत्रज्ञान – महाराष्ट्र
- शिवानी उपारा – क्रीडा – आंध्र प्रदेश
- वैभव सूर्यवंशी – क्रीडा – बिहार
- योगिता मंडावी – क्रीडा – छत्तीसगड
- लक्ष्मी प्रगयिका – क्रीडा – गुजरात
- ज्योति – क्रीडा – हरियाणा
- अनुष्का कुमारी – क्रीडा – झारखंड
- धिनिधि देसिंगु – क्रीडा – कर्नाटक
- ज्योषणा सबर – क्रीडा – ओडिशा
- विश्वनाथ कार्तिके – क्रीडा – तेलंगणा
