MH vs MUM : ऋतुराजच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा दणदणीत विजय, मुंबईचा 128 धावांनी धुव्वा, सलग पाचव्या विजयापासून रोखलं
VHT Maharashtra vs Mumbai Match Result : महाराष्ट्रने मुंबईला जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये सलग आणि एकूण पाचवा सामना जिंकण्यापासून रोखलं. मुंबईचा हा या स्पर्धेतील पहिला पराभव ठरला.

विजय हजारे स्पर्धेतील 2025-2026 या हंगामात महाराष्ट्र क्रिकेट टीमने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात प्रतिष्ठेच्या सामन्यात मैदान मारलं आहे. महाराष्ट्रने मुंबईवर एकतर्फी आणि दणदणीत विजय मिळवला आहे. महाराष्ट्र टीमने मुंबईचा तब्बल 128 धावांनी धुव्वा उडवला आहे. महाराष्ट्रने यासह या मोसमातील एकूण तिसरा आणि सलग दुसरा विजय मिळवला. तसेच महाराष्ट्रने हा सामना जिंकून मुंबईला सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखलं. अर्शीन कुलकर्णी याने महाराष्ट्रच्या विजयात बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. तसेच पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि रामकृष्ण घोष या त्रिकुटाने अर्धशतक केलं. तर प्रदीप दढे आणि सत्यजित बचाव या दोघांनी सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली.
मुंबईचं 42 ओव्हरमध्ये पॅकअप
अर्शीन कुलकर्णी याच्या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्रने मुंबईसमोर 367 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला महाराष्ट्राच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. महाराष्ट्रने मुंबईला 42 ओव्हरमध्ये 238 रन्सवर गुंडाळलं. चाहत्यांना दुखापतीनंतर परतलेल्या यशस्वी जैस्वालकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र यशस्वी 3 धावा करुन मैदानाबाहेर गेला. मुशीर खान याला भोपळाही फोडता आला नाही.
अंगक्रिष रघुवंशी आणि सिद्धेश लाड भागीदारी
ओपनर अंगक्रिष रघुवंशी आणि सिद्धेश लाड या दोघांनी 77 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. सिद्धेश लाड आऊट झाल्याने ही भागीदारी मोडीत निघाली. सिद्धशने 52 धावांची खेळी केली. चिन्मय सुतार आणि हार्दिक तामोरे या दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर शम्स मुलानी याने 24 धावा केल्या. मात्र अंगक्रिष मैदानात असल्याने चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र अंगक्रिषही आऊट झाला. अंगक्रिष याने सर्वाधिक 92 धावा केल्या. अंगक्रिषनंतर तनुषचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
तुषार देशपांडे 6 धावांवर बाद झाला.शार्दूल ठाकुर याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर सिल्वेस्टर डिसोझा 5 धावांवर बाद होताच मुंबईचा डाव आटोपला. तनुष कोटीयन याने केलेल्या नॉट आऊट 36 रन्समुळे मुंबईला 200 पार पोहचता आलं. तनुषला मुंबईला विजयापर्यंत पोहचवता आलं नाही. मात्र तनुषने 36 धावांची खेळी करत मुंबईच्या पराभवातील अंतर कमी केलं.
महाराष्ट्रकडून प्रदीप दढे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सत्यजित बच्छाव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रामकृष्ण घोष, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल आणि अर्शीन कुलकर्णी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
महाराष्ट्रची बॅटिंग
त्याआधी कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. महाराष्ट्रसाठी अर्शीन कुलकर्णी याने शतक केलं. तर पृथ्वी शॉ, ऋतुराज आणि रामकृष्ण घोष या तिघांनी अर्धशतक झळकावलं. ओपनर अर्शीनने 114 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 फोरसह 114 रन्स केल्या. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने आपल्या माजी संघाविरुद्ध अर्धशतक ठोकलं. पृथ्वीने 75 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्ससह 71 रन्स केल्या.
ऋतुराजने 52 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. तर रामकृष्ण घोष याने अखेरच्या क्षणी वादळी खेळी करत नाबाद अर्धशतक केलं. रामकृष्णने अवघ्या 27 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 64 रन्स केल्या. मुंबईसाठी तुषार देशपांडे याने 2 विकेट्स मिळवल्या. तर शम्स मुलानी आमि मुशीर खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
