टीम इंडियाचा नवा हेड कोच; इंग्लंड मालिकेनंतर गौतम गंभीर नसणार! हा दिग्गज सांभाळणार धुरा
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 मालिका सुरू असून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी कोचिंग स्टाफचं चित्र बदललेलं असणार आहे. गौतम गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचा प्रशिक्षक असण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे एका पाठोपाठ एक आंतरराष्ट्रीय दौरे सुरू आहेत. एक दौरा संपला की लगेच दुसरा दौऱ्याची तयारी असं सुरू आहे. आता इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका सुरू आहे. असं असताना झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेची तयारी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे धडाधड मालिकांची रेलचेल सुरू आहे. असं असताना टीम इंडियाच्या व्यस्त वेळापत्रकात हेड कोच बदलणार आहे. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे टूरपासून गौतम गंभीरची जागा घेणार आहे. म्हणजेच हेच कोचची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं जात आहे. झिम्बाब्वे दौराच नाही तर एशियन्स गेम्स 2026 मध्येही व्हीव्हीएस लक्ष्मण हेड कोच असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसचा हेड आहे. भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान जाणार आहे. या दरम्यान भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
प्रशिक्षक बदलणार कारण की…
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. भारताचा माजी फिरकीपटू सुनील जोशी गोलंदाज प्रशिक्षक, तर ऋषिकेश कानिटकर फलंदाज प्रशिक्षक असणार आहे. याच कोचिंग स्टाफसह भारतीय संघ एशियन्स गेम्स खेळण्याची शक्यता आहे. एशियन गेम्स आणि भारत वेस्ट इंडिज मालिकेचं वेळापत्रक एकत्र असल्याने हा बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. गौतम गंभीर या दरम्यान वेस्ट इंडिज वनडे मालिकेसाठी टीम इंडियासोबत असेल. त्याच वेळी भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टी20 एशियन्स गेम्स खेळणार आहे. तेव्हा प्रशिक्षकपद व्हीव्हीएस लक्ष्मणकडे असेल. त्यामुळे त्याच्या आधीच झिम्बाब्वे दौऱ्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाणार आहे.
कसं आहे वेस्ट इंडिज आणि एशियन्स गेम्स वेळापत्रक
भारतीय संघ एशियन गेम्ससाठी 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जापानला जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आधीच संघ जाहीर केला होता. या दरम्यान भारतीय संघ वेस्ट दौऱ्यावर असणार आहे. हा दौरा 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडिज यांच्यात तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. एशियन्स गेम्स आणि वेस्ट इंडिज दौरा एकाच वेळी असल्यान हा बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
