IND vs SA : भारताच्या पराभवाचा गुन्हेगार कोण? एक चूक पडली टीम इंडियावर भारी!
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 ने बरोबरीवर आली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कमबॅक केलं. भारताने दिलेलं 359 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेने गाठलं हे विशेष.. या पराभवाचा गुन्हेगार कोण? ते जाणून घ्या

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या. तसेच विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान खूपच कठीण होतं. पण दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी करत हे विशालकाय आव्हान सहज गाठलं आहे. दक्षिण अफ्रिकेने 4 विकेट आणि 4 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. भारतीय गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. एकतर विकेट मिळत नव्हती. त्यात झेल सोडल्याने पराभव होणार हे निश्चित… त्यात एडन मार्करमसारख्या आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला संधी देणं म्हणजे पायावर धोंडा मारणं.. त्याला जीवदान देणं हीच भारतासाठी मोठी चूक ठरली. कारण त्याची विकेट झटपट मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं.
कुलदीय यादव टाकत असलेल्या 18व्या षटकात ही संधी चालून आली होती. पण यशस्वी जयस्वालने झेल सोडला आणि पराभवाच्या दरीत पडलो. एडन मार्करमचा झेल सोडला तेव्हा तो 53 धावांवर खेळत होता. त्याने मिड ऑनच्या दिशेने मारला. हा चेंडू सीमारेषेवर यशस्वी जयस्वालच्या हातात होता. पण झेल सोडला आणि षटकारही गेला. एडन मार्करमने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत 110 केल्या. म्हणजेच एडन मार्करम झेल सोडल्यानंतर अजून 57 धावा करून गेला. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला.
दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. त्याचा फटकाही पराभवात बसला. अर्शदीप सिंग वगळता सर्वच गोलंदाजांनी 6 च्या वर इकोनॉमी रेटने धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 2 विकेट घेत 10 षटकात 54 धावा दिल्या. प्रसिद्ध कृष्णाने 8.2 षटकात 2 गडी बाद करत 82 धावा, हार्षित राणाने 1 विकेट घेत 10 षटकात 70 धावा, कुलदीप यादवने 10 षटकात 1 विकेट घेत 78 धावा, रवींद्र जडेजाने 7 षटकात 41 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 4 षटकात 28 धावा दिल्या.
