IND vs ENG: तो आडवा आला नाही तर…मॅच संपताच हॅरी ब्रूक संतापला, टीम इंडियातील खेळाडूबद्दल काय बोलला?
भारत आणि इंग्लंडमध्ये रंगलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. मॅच संपल्यानंतर आता पराभवाचा झटका मिळालेला हॅरी ब्रूकने आपले दु:ख बोलून दाखवले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एडजबॅस्टन येथे खेळला गेला. टीम इंडियाने 259 धावांचे लक्ष्य सहज पार करून विजय मिळवला, तर इंग्लंडला चार गडी राखून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली होती त्यामुळे वनडे मालिका जिंकून त्याचा बदला घ्याचाच होता. आता भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने एक विधान केले त्याची जोरदार चर्चा होत आहे. सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार प्रचंड निराश दिसला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात, जेकब बेथेल आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची सलामीची भागीदारी केली. डावाच्या 13 व्या षटकात गुरनूर ब्रार गोलंदाजीसाठी आला तेव्हा, बेथेल (14) त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाकडे झेलबाद झाला. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर डकेट (43) देखील झेलबाद झाला. इंग्लंडच्या विकेट्स पडतच राहिल्या आणि 61 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर त्यांची अवस्था 80 धावांत पाच विकेट्स अशी झाली. याचा अर्थ, इंग्लंडने 19 धावांत पाच फलंदाज गमावले, ज्यात बेथेल आणि डकेट यांच्यासह हॅरी ब्रूक (1), जोस बटलर (5) आणि सॅम करन (0) यांचा समावेश होता.
मधल्या षटकांमध्ये केवळ 20 धावांत या पाच विकेट्स गमावणे इंग्लंडला महागात पडले. याबाबत इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, “20 धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर पुनरागमन करणे खूप कठीण असते. त्यामुळे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला फलंदाजी करताना संघर्ष करावा लागला. याचे मुख्य कारण भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेल होता.” ब्रूकच्या मते अक्षर पटेल इंग्लंडच्या विजयाच्या आडवा आला नाही तर त्यांनी सामना जिंकला असता. अक्षर पटेलने चार विकेट्स घेतल्या, तर गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 76 धावा केल्या, त्यानंतर लियाम डॉसनच्या 68 धावा होत्या, ज्यामुळे एकूण धावसंख्या 258 झाली. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने दुखापतीमुळे निवृत्त होण्यापूर्वी 80 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतके झळकावून भारताला 45.2 षटकांत सहा गडी राखून सहज विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
