
T20 World Cup 2026 New Schedule : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सध्या सुपर-8 राऊंडचे सामने सुरु आहेत. यानंतर नॉकआऊटच्या मॅचेस होतील. यात दोन सेमीफायनल आणि एक फायनल आहे. हे सर्व मोठे सामने आहेत. आयसीसीने त्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे टुर्नामेंटच्या शेड्यूलमध्ये बदल पहायला मिळू शकतो. कुठली टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आणि कोणाचा सामना कोणाबरोबर होईल यावर सुद्धा हा बदल अवलंबून आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने अलीकडेच सेमीफायनलच्या वेन्यू बद्दल गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर महत्वाची भूमिका आहे.
त्यानुसार श्रीलंकेला घरच्या मैदानावर सेमीफायनलचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते. भारत आणि श्रीलंका यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचे यजमान आहेत. सेमीफायनलसाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यात आलं आहे. त्यानुसार सामना भारतात कोलकाता, मुंबई आणि त्याशिवाय श्रीलंकेत कोलंबोमध्ये होऊ शकते. खासकरुन पहिल्या सेमीफायनलची स्थिती फ्लोटिंग आहे. कोलंबो किंवा कोलकता या दोनपैकी एका ठिकाणी सेमीफायनल खेळवण्याचा निर्णय होऊ शकतो.
श्रीलंका-भारत सेमीफायनलमध्ये असतील तर सामना कुठे होईल?
आयसीसीनुसार, जर पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ते आपला सामना 4 मार्चला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळतील. पाकिस्तानी टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला नाही आणि श्रीलंकेने क्वालिफाय केलं तर तर श्रीलंका भारत वगळता अन्य कुठल्याही टीम विरुद्ध कोलंबोमध्येच सेमीफायनलचा सामना खेळू शकते. पाकिस्तानच्या सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी श्रीलंकेला प्राधान्य असेल असं टुर्नामेंट आधीच आयसीसीने जाहीर केलं होतं. आता श्रीलंकेची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर भारत सोडून अन्य कुठल्याही टीम विरुद्ध ते मायदेशात खेळू शकतात. जुन्या शेड्यूलनुसार श्रीलंकन टीमला भारतात सेमीफायनलचा सामना खेळावा लागणार होता. पण आता आयसीसीने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
भारतात सेमीफायनलसाठी कुठल्या वेन्यूंची निवड?
भारत सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. पण तीच सेमीफायनल मॅच पाकिस्तान विरुद्ध असल्यास सेमीफायनल कोलंबोला जाऊन खेळावी लागेल. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या नाहीत तर पहिला सेमीफायनल सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स आणि दुसरा मुंबईत होईल.