Harmanpreet Kaur: भारतीय संघाचे वर्ल्ड कपमधून पॅकअप होताच हरमनप्रीत कौर कर्णधारपद सोडणार? कोच मुजुमदारांनी अखेर सगळं सत्य सांगून टाकलं
कालच्या दिवसात क्रिकेटच्या चाहत्यांना एक नाही तर दोन धक्के बसले. एक म्हणजे भारतीय पुरुष संघाने आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आणि दुसरा म्हणजे भारतीय महिला संघाचे टी-20 वुमन्स 2026 मधून पॅकअप. पण आता त्यानंतरही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ महिला टी-20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वीच संघाचा प्रवास संपला. भारत ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आणि बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान आणि नेदरलँड्सवर प्रभावी विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर, भारतीय संघ तिसऱ्या गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला. त्यानंतर त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथे बांगलादेशला हरवून पुनरागमन केले आणि उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या पण अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर सगळेच चित्र पालटले. आता पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर भडकलेली दिसली. पण हरमनप्रीत कौर कर्णधारपद सोडणार अशी चर्चा रंगली आहे. आता यावर कोच अमोल मुजुमदार यांनी आपले विधान केले आहे.
उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता भारताला रविवारी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाला हरवणे आवश्यक होते, परंतु 170 धावांची मजबूत धावसंख्या उभारूनही, संघ ती धावसंख्या वाचवू शकला नाही आणि सहा गडी राखून सामना गमावला. स्पर्धेतून भारत बाहेर पडल्यानंतर, मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी ‘होम ऑफ क्रिकेट’ येथे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीदरम्यान, हरमनप्रीत भारतीय महिला संघाची कर्णधार म्हणून कायम राहील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देताना मजुमदार म्हणाले की, “हा निर्णय निवड समिती घेईल, पण हरमनप्रीत कर्णधारपदी कायम राहील अशी त्यांना आशा आहे. कर्णधार कोण होणार हे ठरवणे निवड समितीचे काम आहे, पुढे जाण्यासाठी भारताच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे, फलंदाजांना थोडे अधिक आक्रमक होण्याची गरज आहे.”
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना भारताने हरमनप्रीत कौरच्या 56 धावांच्या खेळीमुळे चार गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने एलिस पेरीच्या 56 आणि ॲशले गार्डनरच्या नाबाद 53 धावांच्या जोरावर 19 व्या षटकात चार गडी गमावून लक्ष्य गाठले. भारतीय संघाने मागील वर्षी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता पण आता टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
