या गावात नाहीये एकही दुमजली घर, दुसरा मजला बनवताच येते आफत; ऐकल्यावर तुम्हालाही…
कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील हटलागेरी हे गाव आपल्या अनोख्या परंपरेने ओळखले जाते. येथे एकही दुमजली घर नाही. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार, सत्यम्मा देवीच्या मंदिरापेक्षा उंच कोणतेही घर बांधल्यास संकट येते. यामुळे, श्रीमंत असूनही, सर्वांनी एकमजली घरांमध्येच राहणे पसंत केले आहे.

गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कौलारू, टुमदार अशी घरं सहज डोळ्यासमोर येतात. लहानसं घर, त्यासमोर अंगण, तुळशीचे वृंदावन या गोष्टींमुळे प्रत्येक गावाची एक खास ओळख निर्माण झाली आहे. पण आता शहरीकरणामुळे कौलारू घरांची जागा दुमजली, तीन मजल्यांच्या बंगल्यांनी घेतली आहे. पण तुम्हाला माहितीये का, भारतातील एका राज्यात असे गाव आहे, ज्या गावात एकही दुमजली घर तुम्हाला पाहायला मिळणार नाही… आश्चर्य वाटलं ना? पण हे अगदी खरं आहे. आज आपण या गावाबद्दल जाणून घेऊया.
कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यातील हटलागेरी असे या गावाचे नाव आहे. या गावात तुम्हाला एकही दुमजली घर पाहायला मिळणार नाही. यामागे ग्रामस्थांची एक मोठी श्रद्धा असल्याचे सांगितले जाते. हटलागेरी गावात सत्यम्मा देवीचं मंदिर आहे. या गावातील कोणतेही घर मंदिरापेक्षा उंच नाही. जर या गावात कुणीही आपल्या घराचा दुसरा मजला बांधला तर संपूर्ण गावावर संकट येईल, असे गावकऱ्यांना वाटते.
चार हजार लोकं
या गावाची लोकसंख्या 4 हजार इतकी आहे. या गावात अनेक घर तुम्हाला पाहायला मिळतील. पण एकही दुमजली किंवा तीन मजली इमारत पाहायला मिळणार नाही. गावकऱ्यांच्या मते, पूर्वी एका व्यक्तीने मंदिरापेक्षा उंच दुमजली घर बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर त्या व्यक्तीचे कुटुंब अडचणीत आले. त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली. त्यांना ते घर सोडावं लागलं. याच कारणामुळे, अनेक वर्षांपासून या गावात कुणीही दुमजली घर बांधण्याची हिंमत केलेली नाही. या गावातील लोक कितीही श्रीमंत असले तरी ते फक्त एकमजली घरातच राहणं पसंत करतात.
नावही सारखीच
या गावाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची नावेही सारखी आहेत. सत्यप्पा, छोटा सत्यप्पा, मोठा सत्यप्पा, सत्यम्मा, सत्यव्वा अशी काही नावं तुम्हाला इथे सर्रास पाहायला मिळतात. तसेच आजही गावात जन्मलेल्या अनेक मुलांची नावं देवी सत्यम्माच्या नावावरून ठेवली जातात. ज्यात सतीश नावाचाही समावेश आहे. या गावात सत्यम्मा देवीचं मंदिर एका मोठ्या कडुलिंबाच्या वृक्षाजवळ आहे. गावकरी कोणत्याही परिस्थितीत या कडुलिंबाच्या वृक्षाला तोडत नाहीत.
सत्यम्माचा झाडात वास
कारण त्यांची अशी श्रद्धा आहे की देवी सत्यम्माचा या झाडात वास करते. यामुळेच गावातील लोक दररोज या कडुलिंबाच्या वृक्षाची पूजा करतात. विशेष म्हणजे या झाडाच्या लाकडांचा वापर जाळण्यासाठी कधीही केला जात आहे. हटलागेरी गावातील लोक या कडुलिंबाच्या वृक्षाला देवाप्रमाणे मानतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. आजही या गावातील लोक या परंपरेचं मोठ्या श्रद्धेने पालन करतात. अनेक जण आधुनिक काळात जगत असतानाही या गावातील लोक जुन्या परंपरा जपताना दिसत आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)