आता 18-25 वर्षातील तरुणांना सरकारकडून मिळणार 9 हजार रुपये, योजना नक्की काय?
केंद्र सरकारकडून आता तरुणांना दरमहा ९,००० रुपये मानधन मिळणार आहे. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही आता या योजनेत सहभाग घेता येईल. १८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या (PMIS) नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता ही योजना अधिक सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. या बदलांनुसार, योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव घेण्याची दारे खुली झाली आहेत. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच रोजगाराची संधी आणि उत्तम मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारने देशातील तरुणांच्या हाताला काम आणि योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरु केली होती. आता या योजनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे ही योजना आता अधिक विद्यार्थीस्नेही आणि फायदेशीर ठरणार आहे.
मानधनात भरघोस वाढ
यापूर्वी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५,००० रुपये मानधन दिले जात होते. आता त्यात वाढ करून ते ९,००० रुपये प्रतिमहिना करण्यात आले आहे. या मानधनाचा ९० टक्के खर्च केंद्र सरकार स्वतः उचलणार आहे, तर उरलेला १०% हिस्सा संबंधित कंपन्या देतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरुवातीच्या खर्चासाठी दोन टप्प्यांत मिळून ६,००० रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.
वयोमर्यादा वाढवली
सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी वयोमर्यादेत बदल केला आहे. आता १८ ते २५ वयोगटातील तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. याआधी ही मर्यादा २१ ते २४ वर्षे इतकी होती. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, आता केवळ पदवी पूर्ण केलेले तरुणच नाही, तर पदवी (UG) आणि पदव्युत्तर (PG) शिक्षणाच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे बंधनकारक असेल.
प्रत्यक्ष कामाचा अनुभव
या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कॉर्पोरेट जगाचा प्रत्यक्ष अनुभव देणे असा असणार आहे. प्रामुख्याने सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या जागतिक संधी मिळवणे सोपे जाईल. थोडक्यात सांगायचे तर, शिक्षण सुरू असतानाच किंवा पूर्ण झाल्यावर उद्योगांची गरज समजून घेण्यासाठी आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना तरुणांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.
