मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातून या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबतची माहिती देखील दिली
“गणेशोत्साव सारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली आहे. अतिशय निंदणीय प्रकार घडला आहे. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं”, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.
“संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आतमध्ये पोहोचले. तेव्हा तिथे एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये पीडित महिला अत्यंत नाजूक परिस्थित आढळली. त्यावेळी त्यांनी तातडीने निर्णय घेऊन महिलेला इतरत शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी चौकीदाराकडून घेऊन स्वत: पोलिसांनी गाडी चालवत ताबोडतोब राजावाडी हॉस्पिटलमध्ये महिलेला दाखल केलं. डॉक्टरांनी पीडितेवर त्वरित उपचार सुरु केले होते”, अशी माहिती त्यांनी दिलीय.