पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रीमंडळाचा आज विस्तार निश्चित मानला जातोय. सायंकाळी नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याची
माहिती मिळतेय. ज्या नेत्यांना मंत्री केलं जाणार आहे असे सगळे नेते दिल्लीत दाखल झालेत. काही जण आज दुपारपर्यंत दाखल
होतील. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील यांची नावं चर्चेत आहेत. विशेष म्हणजे मोदी मंत्रीमंडळात ज्यांना स्थान दिलं
जाईल त्याचा फॉर्म्युलाही ठरलाय. नवे मंत्री हे तरुण असतील, टेक्नोक्रॅट असतील, प्रशासकीय अनुभव असलेले असतील याची
खबरदारी घेतली जातेय. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्तारानंतर मोदींच्या मंत्रीमंडळात 20 ते 25 ओबीसी (OBC) मंत्री असतील असं
सांगितलं जातं आहे.
मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराचं जसही वृत्त आलं तसं नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले, हिना गावित यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.
पण आता शेवटचे काही तास उरलेले असताना फक्त नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याच नावावर
शिक्कामोर्तब होताना दिसतं आहे. काही हिंदी वाहिन्या ह्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंही नाव संभाव्य मंत्री म्हणून
घेत आहेत. फक्त नारायण राणे यांचं नाव मात्र जवळपास प्रत्येकाच्या लिस्टमध्ये आहे.