मुंबई : राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसावरून जोरदार राजकारण सुरू आहे. याकारणामुळे भाजप आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आमने-सामने आली आहेत. तर खासदार नवनीत राणा आणि किरीट सोमय्या प्रकरणावरून आता केंद्राने राज्याकडे अहवाल मागवला असून केंद्रानेही राज्यावर डोळे वटारले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात सुरू असलेली हमरीतुमरी दिल्लीतही पहायला मिळेल असे चित्र सध्या आहे. याच दरम्यान राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दिल्ली दौर्यावर गेले असून त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. त्यावरून चर्चा सुरू आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांची दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेत राज्यातील विविध रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.