रायगड : काही दिवसांपू्र्वी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती.भाजपकडून सापत्न वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे, असा गंभीर आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला होता. यानंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने निधी वाटपावरून भाजपला इशारा दिला आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, तेव्हा ज्या मतदार संघात ज्या पक्षाचा आमदार असेल त्या मतदार संघात त्या पक्षाला 70% आणि मित्र पक्षाला 30% असा ठराव केला होता. मात्र रायगड मधील भाजप नेते शिवसेनेला निधी देत नसल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे. हे असेच सुरू राहिले तर येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल असा इशाराच राजा केणी यांनी दिला आहे.