मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच घेण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्येही आज दहावी आणि बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ या नावाने परिचित असलेला विकास पाठक हा व्यक्ती असल्याचं पहायला मिळत आहे. हिदुस्तानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. राज्यात कोरोनाचं सावट आहे. अद्यापही हजारो विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. अशावेळी दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळेतच होईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आज परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आली होती. तसंच त्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही केलं होतं. हिंदुस्तानी भाऊच्या या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आणि धारावी, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.