महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
देशभरात सध्या NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील आंदोलन आणि संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता NEETच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
देशभरात सध्या NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील आंदोलन आणि संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता NEETच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये तामिळनाडू विधानसभेने NEET परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने तामिळनाडूत सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राजकारणापेक्षा एकजूट महत्त्वाची असल्याचे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.
तामिळनाडूने घेतलेला निर्णय महाराष्ट्र सरकारनेही यापूर्वीच घ्यायला हवा होता, असा दावा अमित ठाकरे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2016 मध्येच NEET परीक्षेला विरोध करत ही परीक्षा महाराष्ट्रातील ग्रामीण आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका मांडली होती, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरूनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. MPSC, TET पेपरफुटी, तलाठी भरतीतील कथित घोटाळे तसेच शाळा-कॉलेजमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांचा उल्लेख करत विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्द्यांकडे केवळ राजकीय विरोध म्हणून पाहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांच्या राजकीय अहंकारामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्यावर परिणाम होत असल्याचा दावा अमित ठाकरे यांनी केला. राजकारण हे शेवटी विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि जनतेच्या हितासाठी असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आम्हाला निव्वळ राजकारण करायचं नाही आणि आम्ही विरोधासाठी विरोध करणारे राजकारणी नाही,” अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली. सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थी, तरुण आणि मराठी माणसाच्या हिताचा चांगला निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी सरकारने अहंकार बाजूला ठेवून विरोधकांना डावलण्याची वृत्ती सोडावी, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना अमित ठाकरे यांनी सत्ताकारण आणि दडपशाहीचा खेळ सुरू असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होऊ देऊ नका, असे म्हटले. तामिळनाडूकडून धडा घेऊन विद्यार्थ्यांच्या आणि राज्याच्या हितासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अखेर आपल्या पोस्टचा संदेश स्पष्ट करत अमित ठाकरे यांनी “महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर!” अशी भूमिका मांडली आहे. NEETच्या मुद्द्यावरून करण्यात आलेली ही पोस्ट आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
