औरंगाबादः शिवसेनेनं विधानसभेत संभाजीनगर (Sambhaji Nagar) नावाचा ठराव घ्यावा आणि केंद्रातून हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं वक्तव्य करून डॉ. भागवत कराडांनी (Dr. Bhagwat Karad) पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेकडे (Shiv Sena) चेंडू टोलवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा संभाजीनगर नामांतराचा अजेंडा आहे. मात्र मुस्लिम मतदारांना दुखावून हा निर्णय घेण्याचं धाडस अद्याप एकानेही दाखवलेलं नाही. दरवेळी निवडणुका आल्या की हा मुद्दा उकरून काढला जातो. निवडणुका झाल्या ही मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. आता पुन्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपने या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील शिवसेनेला डिवचलं आहे.