12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर भाजपने (bjp) महाविकास आघाडीवर (maha vikas aghadi) टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट शिवसेना नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. भाजपचं संख्याबळ कमी करण्यासाठीच भास्कर जाधव यांनी षडयंत्र केलं होतं. त्यामुळेच आमचे 12 आमदार निलंबित झाले. त्यांच्यामुळेच हे घडलं. तरीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न मान्य करण्याची त्यांची मानसिकता असेल तर देव या सरकारचं भलं करो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर, नियमित अध्यक्ष मिळेपर्यंत भास्कर जाधवच तालिका अध्यक्ष पाहिजे असं जर सरकारला वाटलं तर सरकारचा कायमस्वरुपी अध्यक्ष बसेपर्यंत मी ती जबाबदारी पार पाडेल. माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी काम करेल. पण एकदा नियमित अध्यक्षाची नेमणूक झाली तर मी तालिका अध्यक्ष म्हणून बसणार नाही, अशी घोषणाच भास्कर जाधव यांनी केली आहे.