सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन… मुख्यमंत्री ऑन बाईक, फडणवीसांनी असे गाठले विधानभवन…पहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन, सोने आणि खाद्यतेल बचतीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतः बाईकवरून विधान भवनात येत इंधन बचतीचा संदेश दिला. हेल्मेट घालून बाईकवर आलेल्या फडणवीस यांच्या मागे मंत्री आशिष शेलार बसले होते. त्यांच्या या अनोख्या एंट्रीमुळे विधान भवन परिसरात एकच चर्चा रंगली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन, सोने आणि खाद्यतेल बचतीचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वतः बाईकवरून विधान भवनात येत इंधन बचतीचा संदेश दिला. हेल्मेट घालून बाईकवर आलेल्या फडणवीस यांच्या मागे मंत्री आशिष शेलार बसले होते. त्यांच्या या अनोख्या एंट्रीमुळे विधान भवन परिसरात एकच चर्चा रंगली.
वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री बाईकने विधान भवनात पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.” यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली.
दरम्यान, बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक परिस्थिती वगळता शासकीय विमान आणि हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही प्रोत्साहन दिले असून, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बैठका आणि चर्चासत्रांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून, मंत्रिमंडळातील इतर नेत्यांची वाहनेही पेट्रोल-डिझेलवरून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही वापर केला जात आहे. काल मंत्री अतुल सावे मंत्रालयात पायी चालत आल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
