शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयानंतर औरंगाबाद काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत पक्षातील इतर 20 ते 25 पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिला आहे. औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात येत होती. मात्र या मागणीला वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध करण्यात येत होता.