नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेसकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी राजधानी दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधीवर काँग्रेसतर्फे आज सत्याग्रह केला जात आहे. यावेळी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला. तसेच या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझ्या कुटुंबाने रक्त सांडलं आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
तुम्ही माझ्या भावाला शहीद, देशद्रोही आणि मीर जाफरचा मुलगा म्हणता. तुम्ही त्याच्या आईचा अपमान करता. तर आपले मुख्यमंत्री म्हणतात की, राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहे हे माहीत नाही. ते रोज माझ्या कुटुंबाचा अपमान करतात. मात्र गुन्हा दाखल होत नाही. पंतप्रधान लोकांच्या खचाखच भरलेल्या संसदेत म्हणतात, ‘हे कुटुंब नेहरू हे नाव का वापरत नाही’. ते काश्मिरी पंडितांच्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान करतात.