CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी… नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे सांगितले. गणेशोत्सवात कोणताही अडथळा येऊ नये, असे आवाहन करत सणासुदीत लोकांना त्रास होऊ नये, असे ते म्हणाले. जरांगे यांची एक मागणी न्यायालयात असल्याने कोर्टाविरोधात जाणे मराठा समाजासाठी हानिकारक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, केवळ एक मागणी सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या विरोधात जाणे मराठा समाजासाठी हानिकारक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. पुढील काळात गणेशोत्सवासारखा मोठा सण येत असल्याने, सणासुदीच्या दिवसांत लोकांना कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, त्यामुळे या उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी जरांगे पाटील यांचा पूर्वीचा अर्ज नाकारला असून, नवीन अर्ज आल्यास त्यावर गुणवत्तेनुसार कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर काम सुरू होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
