धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आणि गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी हे पंचनामे करत आहेत. या पावसाचा 71 गावांना फटका बसला असुन 38 घरांची पडझड झाली आहे. तर 3 नागरिक जखमी झाले आहेत. काल दिवसभरात केलेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताना पाठवला आहे. आजही दुसऱ्या दिवशीचे पंचनामे सुरु झाले आहेत. 16 मिमीच्या पुढे पाऊस पडलाय. तर सर्वाधिक 2 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान एकट्या धाराशिव तालुक्यात झालंय. 900 कोंबडी पिल्ले दगावली आहेत. जिरायत क्षेत्र 1 हजार 74 हेक्टर, बागायत क्षेत्र 835 हेक्टर तर फळबागा 662 हेक्टरचं नुकसान झालं आहे.