नागपूरः राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोणती सुरक्षा द्यायची, याचा निर्णय कमिटी घेईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली कडव्या हिंदुत्वाची भूमिका, मशिदीवरील भोंग्यासंदर्भात दिलेला इशारा यानंतर ते चर्चेत आलेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली होती. त्यानंतर राज यांना केंद्र सरकार झेड प्लस सुरक्षा देणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या जीवाला धोका असल्यास सुरक्षा देण्यात गैर नाही, असे वक्तव्य केले होते. राज यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही घटकांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली जाते. मात्र, त्यांच्याकडून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले जाते. मात्र, राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून जास्त सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.