महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंकडून कराड बंधूंवर गंभीर आरोप!
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणानंतर त्यांचे कुटुंब धास्तावले आहे. पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन वाल्मिक कराड, सुशील कराड आणि श्री गणेश कराड यांच्याकडून आपल्या कुटुंबियांना धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. मुलावरील हल्ल्यानंतर त्यांनी आरोपी गोट्या गितेच्या तात्काळ अटकेची आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 28 महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणात काही संशयितांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आली असली तरी अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी वाल्मिक कराड, सुशील कराड आणि श्री गणेश कराड यांच्याकडून आपल्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याची गंभीर भीती व्यक्त केली आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शिवजयंतीच्या दिवशी ट्युशनहून परत येत असताना त्याला एका अनोळखी व्यक्तीने अडवून मारहाण केली. या घटनेनंतर कुटुंबाची भीती आणखी वाढली आहे. संशयित आरोपी गोट्या गिते अजूनही फरार असल्याने त्याच्या तात्काळ अटकेची आणि आपल्या भावाला तसेच संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
