महाराष्ट्रात यंदा अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. नांदेडमध्येही मागील काही दिवसांच जोरदार अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून काही शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्याने त्यांना आपली व्यथा कॅमेऱ्यासमोर मांडताना रडू कोसळले आहे. नांदेडच्या काही भागात पेठवडज मध्यम प्रकल्पाचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे. संबधित प्रकल्पाची भिंत जीर्ण झाली असल्याने अशाप्रकारे पाणी शेतात शिरलं.
नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर पीकविमा कंपण्यासह सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा कंपन्यांना फोटो पाठवावे लागतात, मात्र विमा कंपन्यांचे इंटरनेट सर्व्हर बंद पडलंय. त्यामुळे नुकसानीचे फोटो पाठवावे कसे असा सवाल शेतकरी करतायत, तर दुसरीकडे महसूल विभागाने अद्यापही नुकसान झालेल्या शेताकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना येतेय. काढणीला आलेलं पीक हाथचे गेल्याने आता आगामी सणासुदीचे दिवस काढावेत कसे असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय.