PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
पीएफ काढण्यासाठी खोट्या कारणांचा वापर केल्यास आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. नव्या ईपीएफओ नियमांनुसार, चुकीची माहिती दिल्यास रक्कम वसूल केली जाईल, व्याज आकारले जाईल आणि तीन वर्षांसाठी पीएफ काढण्यास बंदी घातली जाईल. केवळ वैध कारणांसाठीच पीएफचा वापर करा, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.
पीएफ काढण्याबाबत ईपीएफओने महत्त्वाचे नियम बदलले आहेत. यापुढे, जर तुम्ही खोट्या कारणाने किंवा चुकीची माहिती देऊन भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्वरित थांबावे. कारण अशा फसव्या प्रयत्नांवर ईपीएफओची कडक नजर असून, या कृतीचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
नव्या नियमांनुसार, खोटं कारण समोर आल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर त्याहून मोठी कारवाई केली जाईल. चुकीच्या माहितीच्या आधारे पीएफचा पैसा काढल्यास ईपीएफ योजना १९५२ अंतर्गत ती रक्कम वसूल केली जाईल. एवढेच नाही तर वसूल केलेल्या रकमेवर व्याजही आकारले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा कर्मचाऱ्याला पुढील तीन वर्षांसाठी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यास प्रतिबंध केला जाईल.
पीएफचे पैसे केवळ विवाह, मुलांचे शिक्षण, गंभीर आजार किंवा घर खरेदी व दुरुस्ती यासारख्या विशिष्ट आणि वैध कारणांसाठीच काढता येतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी काढलेली रक्कम वापरल्यास तुम्हाला मूळ रकमेपेक्षा अधिक व्याज भरून भरपाई करावी लागेल. ईपीएफओने स्पष्ट केले आहे की, पीएफ खाते हे कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आहे, त्याचा गैरवापर करू नये.
