मुंबई : राज्यात सर्वात मोठा सत्ताबदल (Maharashtra Political Crisis) घडून आलाय. यामुळे रोज राजकीय घडोमोडींना वेग येतोय. अडीच वर्षांचं ठाकरे सरकार (Uddhav Thackerya) गेलं आणि आता शिंदे-भाजप (Eknath Shinde) सरकार सत्तेत आलंय. शिंदे-फडणवीस सरकारसाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होतंय. आज आणि उद्या अशा दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला अनेक परीक्षा पास कराव्या लागणार आहेत. शिंदे सरकारसाठी प्रत्येक पेपर हा कसोटीचा आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तर उद्या या नव्या सरकारला बहुमत चाचणीचीही कसोटी पार करावी लागणार आहे. त्यातच आता व्हीपवरून दोन्ही बाजुने दावे प्रतिदावे केले जात असल्याने पुढे काय होणार? याचा अंदाज हा भल्या भल्या राजकीय पंडितांनाही लागेना झालाय.