औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 1 मे, महाराष्ट्र दिनी औंरगाबादेत जाहीर सभा होणार आहे. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) 3 मे चा अल्टिमेटम दिलाय. तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. अशावेळी राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना सभेपूर्वी इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरे औरंगाबादेत येत आहेत. सभेला जाण्यापूर्वी त्यांनी यावं, आम्हा सर्वांसोबत इफ्तार करावा आणि त्यानंतर त्यांनी स्टेजवर जाऊन काय बोलायचं ते बोलावं, असं जलील यांनी म्हटलंय.