देशात गेल्या 24 तासांत 91,702 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3403 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत होते. हा आकडा अगदी 60 हजारापर्यंत खाली गेला होता. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.
आता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा 90 हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे दिसत आहे. मात्र, समाधानाची बाब इतकीच की देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,34,580 इतकी आहे.