भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही कारवाई गृहमंत्रालयाने केली आहे, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी एकप्रकारे सोमय्यांवरील कारवाईचं खापर राष्ट्रवादीवर फोडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सोमय्यांनी केंद्रसरकारवर बोलावं. इतर राज्यातील भाजपची सरकारं आहेत. त्यावर बोलावं. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, यंत्रणा आहेत, लाचलूचपत विभाग आहे. या संस्था पक्षपात न करता काम करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांवर आरोप करत आहात. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न होत असेल तर राज्याचं गृहमंत्रालय कारवाई करत असतं. कालपासून मी पाहतो ही राज्याच्या गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. गृहमंत्रालयाला काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असं ते म्हणाले.