मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेसुद्धा कालपासून दिल्लीत आहेत. शिंदे आणि फडणवीसांच्या या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या सर्व वाटाघाटी यावेळी पूर्ण होतील अशी सूत्रांची माहिती आहे. आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयीन खटला सुरु असल्याने मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. या मुद्यावर विरोधकांकडून सरकारवर टीकेचा वर्षाव सुरु आहे. तूर्तास मंत्र्यांअभावी सर्व कारभार सचिवांच्या खांद्यावर सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.