कल्याणमधील मलंगगड परिसरात तरुण-तरुणींना झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर कारवाई करण्यात आली आहे. पाच आरोपींना उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. आरोपी हे कुशिवली परिसरातच राहणारे आहेत.
कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार काल उघडकीस आला होता. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी चौघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नव्हती. अखेर ‘टीव्ही9 मराठी’ हे वृत्त उचलून धरल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. सोमनाथ वाघ, अशोक वाघ यांच्यासह एकूण पाच आरोपींना हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.