मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून…
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलन दडपण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी म्हटले की, त्यांच्या सहकाऱ्यांच्या घशात ईडीच्या नोटिसा टाकल्या जात आहेत. जर ही दडपशाही थांबली नाही, तर संबंधितांच्या पाहुण्या-रावळ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मराठा आंदोलन थांबवण्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटिसा बजावण्यात येत आहेत. यामुळे जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे पाटील यांनी म्हटले की, “फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यासोबत काम करणाऱ्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या जात आहेत.
आंदोलन बंद पाडण्यासाठी हा षडयंत्र रचला जात आहे.” त्यांनी ईडीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, जर हा प्रकार थांबला नाही, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संबंधितांच्या पाहुण्या-रावळ्यांविरोधातही तक्रारी दाखल करून चौकशीची मागणी केली जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी मराठा समाजाला याविरोधात एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.
